संत्रा बेल्टमध्ये वाढल्या शेतकरी आत्महत्या
गरजू शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देण्याचे नीलेश हेलोंडे यांचे निर्देश

अमरावती : जिल्ह्यातील संत्रा उत्पादक भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासोबतच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळण्यासाठी सर्व यंत्रणांनी या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना योजनांचा लाभ द्यावा, असे आवाहन कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. नीलेश हेलोंडे पाटील यांनी सोमवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांना मदत होणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर जिल्हाधिकारी विवेक जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते.
शेतीमधीलउ त्पादन वाढविण्यासोबतच शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे, यासाठी प्रेरणा प्रकल्प कार्यरत आहे. यातून शेतकऱ्यांची मानसिकता बदलणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यासाठी आशा कार्यकर्त्याच्या माध्यमातून सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील, असे ते म्हणाले. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील युवकांना प्राधान्य मानून त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कौशल्य विकास तसेच आरसेटीच्या माध्यमातून कमी कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचा उपयोग होऊन तातडीने उत्पन्नाचे साधन त्यांना मिळू शकेल. या योजना माहिती होण्यासाठी ग्रामपातळीवर प्रयत्न करावेत असे ते म्हणाले.
सावकारांवरील कारवाया सुरूच ठेवण्याची सूचना सर्व बाजार समित्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजनकाटे सक्तीचे केल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही तसेच अवैध सावकारांवर कारवाई करून जमीन मूळ मालकाला परत करावी. यात आतापर्यंत १८ हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत केली आहे, ही स्वागतार्ह बाब असून, येत्या काळात कार्यवाहीचा वेग वाढविण्यात यावा, आदी सूचनाही अॅड. हेलोंडे यांनी दिल्या.